गांधारी
गांधार नरेश ची राजकुमारी असलेली गांधारी हस्तिनापुरात विवाह पश्चात आली .दृष्टी असूनही आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून तिने आपलं विश्व अंधारात सामावून घेतलं होतं.जन्मांध धृतराष्ट्राला पती मानताना झालेल्या वेदना, क्लेश कोणी जाणले असतील का तिचे?पितामह भीष्म यांनी खेळी खेळली आणि युवराज पांडूशी विवाह न होता आंधळा धृतराष्ट्र तिच्या वाटेस आला आणि त्याबरोबर मिळणारं महाराणी पदही गेलं.युधिष्ठिर आधी जन्माला आला आणि आपल्याला पुत्ररत्न नाही तर कुरू सिंहासन आपल्या पुत्राच्या वाट्याला नाही या सत्याचाही सौम्यपणे गांधारीने प्रालब्ध म्हणून स्वीकार केला.डोळ्यांवरील रेशमी पट्टीमागे जणू सारं दुःखं लपवलं होतं तिने.
कुटील शकुनीची बहीण गांधारी -
गांधारीचा भाऊ शकुनी याला कदापि हे मान्य नव्हते की आपल्या बहिणीचा विवाह अंध धृतराष्ट्राशी होतोय.त्यानंतर पुत्र प्राप्ती उशीरा झाल्याने हस्तिनापूरचे सिंहासन पांडव पुत्रांकडे गेल्याने शकुनीची कारस्थानं सुरू झाली.जी जाणवत असून गांधारी थांबवू शकली नाही.कारण शकुनीने आपल्या मुलांना दुर्योधन, दुःशासन यांना प्रतिशोधाच्या खेळातल्या कळसुत्री बाहुल्या बनवल्या आहेत हे ती समजू शकायला कमी पडली.
पतिव्रता गांधारीचं शल्य -
धृतराष्ट्र इतका क्रूर होता की त्याने आपली पत्नी गांधारीच्या पिता आणि भावंडाना अंधार कोठडीत उपाशी ठेवून मारलं होतं.तिने खूप गयावया करूनही दुष्ट धृतराष्ट्राने ऐकले नाही.कसंतरी शकुनीला वाचवण्यात तिला यश मिळालं होतं.
गूढ गुपित आयुष्य - महाराणी नाही तर मग राजमाता तरी बनण्याची आस असलेल्या गांधारीच्या वाट्याला नियतीने निराशाच दिली.नैराश्याने गर्भपात करण्याचा प्रयत्न करताना व्यासमुनींच्या आशीर्वादाने त्याच गर्भातून शंभर पुत्र जन्मले.पण त्यादरम्यान एका दासीने धृतराष्ट्र पुत्राला जन्म दिला.युयुत्सु त्याचं नाव.काय वाटलं असेल गांधारीला आपल्याच पतीच्या दासीपुत्राला पाहून?आपल्याच पतीने आपल्याशी केलेली प्रतारणा बघून किती दुःखी झाली असेल गांधारी! ज्या पतीसाठी दृष्टी असून एका रेशमी पट्टीत अंधार प्यायलेली गांधारी….बिचारी …केविलवाणी गांधारी…
कौरवांची माता गांधारी -
कौरवांची ही माता खंबीरपणे उभी राहण्यात कमी पडली.आई म्हणून ती कमी पडली का खरंच? शंभर पुत्र तिचा अनादर करत रहायचे.आपल्या मातेवर कौरवांची निष्ठाच नव्हती.पण जग नेहमी म्हणत राहिलं की गांधारीला तमा नव्हती आपल्या पुत्रांची, ताबा नाही पुत्रांवर गांधारीचा.
एकटी हरलेली गांधारी -
कौरवांची जे नैतिक अधःपतन झालं त्याला गांधारी स्वतःस जबाबदार मानते.द्रौपदी वस्त्र हरण, कुरुक्षेत्र युध्दभूमीवरील युध्द, सार्यांचंच खापर जगाने गांधारीवर फोडलं.
पण युध्दभूमीवरील आपले मृत शंभर पुत्र पाहून विलाप करणारी एकाकी गांधारी कुणाला दिसली असेल का?
मला तिच्या रुपात धीरगंभीर दुर्गा दिसतेय.
अशा धीरगंभीर पतिव्रता दुर्गेस शतशः नमन…🙏🏼🙏🏼
©️ Shraddha Sudame
8830784103

आणखी एका पात्राची अनोख्या अनुपम पद्धतीने
ReplyDeleteजगाला ओळख करून देणाऱ्या श्रध्दा la हृदयातून धन्य वाद. किती साध्या सरळ सुलभ शब्दात
मुद्देसूद मांडणी करतेस की काय सांगू.
Keep it up.
असच जगासमोर येऊ दे.
बेस्ट ऑफ लक.